गुढीपाडवा: नववर्षाचे स्वागत आणि विजयाचा उत्सव- उल्का देवरुखकर
- Neel Writes
- Mar 30
- 2 min read
गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा प्रारंभ दर्शवणारा एक पवित्र सण आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा होणारा हा दिवस केवळ कालगणनेच्या दृष्टीने नव्हे, तर ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातूनही अत्यंत महत्त्वाचा आहे.

गुढीपाडव्याचा उल्लेख प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये आढळतो. मान्यता अशी आहे की या दिवशी भगवान ब्रह्मदेवांनी सृष्टीची निर्मिती केली. म्हणून या दिवसाला ‘सृष्टिसंस्थापक दिन’ असेही संबोधले जाते.
इतिहासात पाहता, या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करण्याचा निर्धार केला होता आणि विजयी निशाण म्हणून गुढी उभारण्याची परंपरा सुरू केली. पुढे पेशव्यांनीही हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला. युद्धात विजय मिळविल्यानंतर विजयी पताका म्हणून गुढी उभारण्याची परंपरा त्यांनी पुढे नेली. त्यामुळे गुढी हे विजयाचे आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते.
गुढी म्हणजे विजयाची, आनंदाची आणि नवचैतन्याची निशाणी. गुढी उभारण्यासाठी काठीला रेशमी वस्त्र, फुलांचा हार, साखरेच्या गाठी आणि कडुलिंबाच्या पानांनी सजवले जाते. गुढीवर ठेवलेला तांब्या किंवा पितळी भांडे (कलश) हे विजयाचे आणि श्रीमंतीचे प्रतीक आहे.
प्रभू श्रीराम रावणावर विजय मिळवून अयोध्येत परतले, तेव्हा अयोध्यावासीयांनी गुढी उभारून आनंदोत्सव साजरा केला.
गुढीपाडव्याच्या दिवशी सम्राट शालिवाहन यांनी आपल्या सैन्यासह शत्रूंवर विजय मिळवला आणि नवीन शकसंवत सुरू झाले.
हिवाळ्यानंतर शेतीच्या नवीन ऋतूची सुरुवात या दिवसापासून होते. शेतकऱ्यांसाठी हा आनंदाचा दिवस असतो.
गुढी ही सूर्यप्रकाशाच्या साक्षीने उभारली जाते, कारण ती तेजाचे, ऊर्जा आणि विजयाचे प्रतीक आहे. संध्याकाळी सूर्यास्तानंतर गुढी खाली घेतली जाते, कारण रात्रीच्या वेळी ध्वज किंवा विजयपताका उभी ठेवण्याचा संकेत नाही. याशिवाय, ती जास्त वेळ बाहेर ठेवल्यास वारा किंवा हवामानामुळे खराब होण्याची शक्यता असते.
गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंबाची पाने, गूळ आणि जिरे एकत्र करून खाल्ले जाते. याचा आरोग्यासाठी फायदा होतो आणि हे मिश्रण जीवनात गोडसर आणि कडू अनुभवांना स्वीकारण्याची शिकवण देतं. या दिवशी नवीन संकल्प केले जातात, घराची साफसफाई होते आणि मंगलकार्यांना प्रारंभ करण्याचा उत्तम मुहूर्त मानला जातो.
गुढीपाडव्याचे सांस्कृतिक आणि सामाजिक महत्त्व
नववर्षाचा पहिला दिवस म्हणून आनंदोत्सव
नवीन कार्यारंभासाठी शुभ दिवस
परंपरेचे आणि ऐतिहासिक विजयाचे स्मरण
गुढी उभारून विजय, समृद्धी आणि मंगलप्राप्तीसाठी प्रार्थना
हा सण शुभ, मंगल आणि विजयाचे प्रतीक मानला जातो. आपल्या जीवनातही सदैव गुढीप्रमाणे यश, आनंद आणि समृद्धी नांदो, हीच श्रीराम आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी प्रार्थना!
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
Comments